सोनालीची आत्महत्या किंवा नैसर्गिक मृत्यू नसून घातपात असल्याचा इन्सुली ग्रामस्थांचा संशय
इन्सुली कोठावळेबांध येथील सोनाली प्रभाकर गावडे या युवतीच्या मृत्यू प्रकरणात नाट्यमय घडामोडी घडत आहेत. या पार्श्वभूमीवर इन्सुली ग्रामस्थांनी सोमवारी बांदा पोलीस स्टेशनवर धडक दिली. सोनालीची आत्महत्या किंवा नैसर्गिक मृत्यू नसून घातपात असल्याचा संशय व्यक्त केला. या प्रकरणाचा कसून तपास करावा व संशयिताला गजाआड करावे, अशी आग्रही मागणी करण्यात आली. सोनाली मृत्युप्रकरणी सर्व बाजूने तपास सुरू असल्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गजेंद्र पालवे यांनी सांगितले.
यावेळी माजी जि. प. शिक्षण व आरोग्य सभापती गुरुनाथ पेडणेकर, माजी पंचायत समिती सभापती मानसी धुरी, इन्सुली सरपंच तात्या वेंगुर्लेकर, उपसरपंच नमिता नाईक, विकास केरकर, भाजपा बांदा मंडल अध्यक्ष स्वागत नाटेकर, ग्रा. पं. सदस्य महेश धुरी, माजी सरपंच विठ्ठल पालव, निगुडे माजी सरपंच झेवियर फर्नांडिस, महेंद्र सावंत, औदुंबर पालव, अरुण गावडे, दादा परब उपस्थित होते.
पोलीस निरीक्षकांच्या समवेत झालेल्या बैठकीत स्थानिकांनी अनेक शंका उपस्थित केल्या. कामावर जाण्याची रोजची वाट सोडून ती अडगळीच्या वाटेवर का गेली ?, घसरून पाण्यात पडली असेल तर तिच्या अंगावर जखम का नाही ?, सीसीटीव्हीत दिसणारा तो तरुण कोण ? याचा शोध पोलिसांनी घ्यावा, अशी आग्रही मागणी करण्यात आली.
पोलिसांकडून सर्व शक्यता पडताळून पाहण्यात येत आहेत. त्यादृष्टीने पोलीस या प्रकरणाचा कसून तपास करीत आहेत. स्थानिक गुन्हे अन्वेषणची टीम तपास करीत आहे. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या अहवालात तिचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याचे म्हटले आहे. शिवाय तीच्या अंगावर जखमही नव्हती. सीसीटीव्हीत दिसणाऱ्या त्या तरुणाच्या अंगावरील कपडे पाहता तो स्थानिक असल्याचा अंदाज निरीक्षक गजेंद्र पालवे यांनी व्यक्त केला. जर सोनालीचा घातपात झाला असेल तर संशयीताला नक्कीच गजाआड केले जाईल, असा विश्वास त्यांनी ग्रामस्थांना दिला.