जल्लोष, हा केवळ सांस्कृतिक कार्यक्रम नसून देवगडच्या ओळखीचा उत्सव – तहसीलदार रमेश पवार

देवगड व्यापारी पर्यटन संस्थेच्या वतीने आयोजित ‘जल्लोष २०२६’चे जल्लोषात उद्घाटन

देवगड (प्रतिनिधी)

देवगड म्हणजे केवळ एक तालुका नसून निसर्गाची देणगी, हापूस आंब्याचा सुवास, समुद्रकिनारे आणि कष्टाळू माणसांची ओळख असल्याचे प्रतिपादन देवगडचे तहसीलदार आर. जे. पवार यांनी केले. देवगड तालुका व्यापारी पर्यटन संस्थेच्या वतीने आयोजित “जल्लोष २०२६” या भव्य पर्यटन व सांस्कृतिक महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर भाजपा जिल्हा सरचिटणीस संदीप साटम व्यापारी पर्यटन संस्थेचे अध्यक्ष हनीफ शेठ मेमन, देवगड व्यापारी संस्थेचे अध्यक्ष शैलेश कदम जिल्हा व्यापारी संघाचे अध्यक्ष प्रसाद पारकर एकनाथ तेली प्रवीण पोकळे देवगड जामसंडे नगरपंचायतीच्या मुख्य अधिकारी गौरी पाटील देवगड जामसंडे नगरपंचायतीच्या सभापती तन्वी चांदोस्कर शामराव पाटील दयानंद पाटील प्रवीण सावंत मान्यवर अतिथी, देवगड तालुका व्यापारी पर्यटन संस्थेचे पदाधिकारी, व्यापारी बांधव, युवक, माता-भगिनी व मोठ्या संख्येने देवगडवासी उपस्थित होते.

तहसीलदार पवार म्हणाले की, “जल्लोष” हा केवळ सांस्कृतिक कार्यक्रम नसून देवगडच्या ओळखीचा उत्सव असून भविष्यातील पर्यटन विकासाचा मजबूत पाया आहे. आज पर्यटन म्हणजे केवळ पाहणे नव्हे, तर अनुभव घेणे असून देवगडसारखा तालुका असा अनुभव देण्यासाठी महाराष्ट्रात दुर्मिळ आहे. समुद्रकिनारे, मंदिरे, किल्ले, निसर्गसंपदा, मासेमारी, हापूस आंबा, स्थानिक खाद्यसंस्कृती आणि अशा जल्लोषसारखे उत्सव एकत्र आल्यास देवगडचा पर्यटन ब्रँड तयार होतो, असे त्यांनी सांगितले.

पर्यटन विकासामुळे स्थानिक युवकांना रोजगार, कलाकारांना व्यासपीठ, व्यापाऱ्यांना आर्थिक संधी तसेच शेतकरी व मच्छीमारांना थेट लाभ होतो. लोकसहभागातून होणारा विकासच शाश्वत ठरतो, असेही त्यांनी स्पष्ट केले. पर्यटनाला चालना देणाऱ्या सकारात्मक उपक्रमांना प्रशासनाकडून नेहमीच सहकार्य राहील, असे आश्वासन देतानाच शिस्त, स्वच्छता, सुरक्षितता आणि पर्यावरण संवर्धन जपण्याचे आवाहन त्यांनी केले.

नवीन वर्ष देवगड तालुक्यासाठी अधिक पर्यटन, अधिक रोजगार आणि अधिक समृद्धी घेऊन येवो तसेच “जल्लोष” ही परंपरा दरवर्षी अधिक भव्य होत राहो, अशा शुभेच्छा देत तहसीलदार आर. जे. पवार यांच्या हस्ते “जल्लोष २०२६” या कार्यक्रमाचे अधिकृत उद्घाटन करण्यात आले. यावेळी प्रसाद पारकर संदीप साटम गौरी पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ऋत्विक धुरी तर आभार दयाळ गावकर यांनी मांडले.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *