बांदा (प्रतिनिधी)
... अन्यथा उपोषण छेडणार ; मडुरा, पाडलोस परिसरातील वीज ग्राहकांचा इशारा
पावसाळा तोंडावर आला असून वीज वितरण मात्र अपेक्षित कामगिरी बजावत नाही. मडुरा, रोणापाल, पाडलोस, निगुडे, कास, सातोसे, आरोस गावातील जीर्णावस्थेतील वीज वाहिन्या व खांब धोकादायक बनले आहेत. उष्णता कमालीची वाढली असून वीजपुरवठा वारंवार खंडित होत आहे. याचा शेतकरी, लहान उद्योजक, बागायतदारांसह इतरांना मोठा फटका बसत आहे. त्यामुळे तत्काळ वीज समस्या कायमस्वरुपी सोडवा अन्यथा सर्व ग्रामस्थांना घेऊन उपोषण छेडण्याचा इशारा पाडलोस सहकारी सोसायटी माजी संचालक आनंद कुबल यांनी दिला आहे.
गेल्यावर्षी मे महिन्यात झालेल्या चक्रिवादळामुळे मडुरा, रोणापाल, पाडलोस, निगुडे, कास, सातोसे, आरोस भागात वीज वाहिन्या व खांब कोसळले होते. त्यामुळे काहीकाळ ग्रामस्थांना अंधारात राहावे लागले होते. ट्रान्सफार्मर विजेचा भार उचलू शकत नसल्यामुळे वीज गुल होते. उन्हाळ्यात पंख्याशिवाय राहणे अशक्य आहे. वीज समस्या सोडविण्यासाठी स्थानिक आमदार, राजकीय नेत्यांना निवेदने देण्यात आली. मात्र त्याचा उपयोग झाला नसून फक्त आश्वासने मिळाली. त्यामुळे जनता आश्वासनांसह वीज समस्येने हैराण झाल्याचे श्री.कुबल यांनी सांगितले.
