कणकवली दि १० ऑक्टोबर (तुळशीदास कुडतरकर)
समाज साहित्य प्रतिष्ठान सिंधुदुर्गतर्फे देण्यात येणाराकवी सफरअली इसफ यांना भूमी काव्य पुरस्कार जाहीर
समाज साहित्य प्रतिष्ठान सिंधुदुर्गतर्फे देण्यात येणारा प्रतिष्ठेचा प्रकाश रामचंद्र रसाळ स्मृती भूमी काव्य पुरस्कार सिंधुदुर्गातील प्रसिद्ध कवी सफरअली इसफ यांच्या दर्या प्रकाशन पुणेतर्फे प्रकाशित करण्यात आलेल्या ‘अल्लाह ईश्वर’ या आजच्या मराठी कवितेतील बहुचर्चित काव्यसंग्रहाला जाहीर झाला आहे. दहा हजार रुपये, स्मृतीचिन्ह शाल आणि ग्रंथ असे पुरस्काराचे स्वरूप असून नामवंत समीक्षक प्रा.डॉ.रणधीर शिंदे यांच्या परीक्षणातून सदर पुरस्कारची निवड करण्यात आली असल्याची माहिती समाज साहित्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष मधुकर मातोंडकर आणि प्रमुख कार्यवाह सुरेश बिले यांनी दिली.
समाज साहित्य प्रतिष्ठानतर्फे दरवर्षी उत्कृष्ट काव्यसंग्रहाला सातारा येथील प्रकाश रामचंद्र रसाळ स्मृती भूमी काव्य पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. यासाठी ग्रंथ मागविले जात नाहीत मात्र अगदी वेगळी कविता लिहिणाऱ्या कवीची स्वतंत्रपणे निवड केली जाते. यावर्षी या पुरस्कारासाठी ‘अल्लाह ईश्वर’ या अतिशय वेगळ्या कविता असणाऱ्या काव्यसंग्रहाची निवड करण्यात आली. या संग्रहाला ज्येष्ठ अभ्यासक चंद्रकांत वानखडे यांची दीर्घ प्रस्तावना लाभली आहे.
