कणकवलीत साहित्याचा जागर; ‘कोमसाप’च्या व्यासपीठावर उमटले मायबोलीचे विविध रंग !

0 minutes, 3 seconds Read

 

​कणकवली (तुळशीदास कुडतरकर)

‘लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी’ या उक्तीचा प्रत्यय नुकताच कणकवलीत आला. कोकण मराठी साहित्य परिषद (कोमसाप), शाखा कणकवली यांच्या वतीने ‘मराठी राजभाषा गौरव दिनानिमित्त’ गोपुरी आश्रम येथे एका विशेष सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. साहित्याचा हा जागर मान्यवर साहित्यिक आणि रसिक प्रेक्षकांच्या उपस्थितीत रविवारी, १ मार्च २०२६ रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

दीप प्रज्वलन आणि मंगलप्रारंभ:
कार्यक्रमाची सुरुवात मांगल्यपूर्ण वातावरणात दीप प्रज्वलनाने झाली. या प्रसंगी कार्यवाह निलेश ठाकूर आणि राजस रेगे यांची प्रमुख उपस्थिती होती. यानंतर प्रवीण कुबल यांनी कवी कुसुमाग्रजांचे अजरामर ‘पृथ्वीचे प्रेमगीत’ आपल्या दमदार आवाजात सादर करून कार्यक्रमात चैतन्य भरले.

​    बहारदार सादरीकरण आणि काव्य मैफल:
चिमुकल्या स्वानंदी प्रवीण कुबल हिने प्रभावी एकपात्री सादरीकरण करून उपस्थितांची दाद मिळवली. हर्षदा प्रवीण कुबल आणि कवी कमलेश गोसावी यांनी आपल्या कवितांतून भावविश्व उलगडले. कवयित्री रीमा भोसले यांनी काव्य सादरीकरणासोबतच सर्वांकडून ‘मराठी भाषा प्रतिज्ञा’ वदवून घेत मराठी अस्मितेची आठवण करून दिली. केंद्रप्रमुख विजय मसुरकर यांनी ‘गर्जा जयजयकार क्रांतीचा’ हे गीत सादर करून उपस्थितांच्या अंगावर शहारे आणले.

​ वैचारिक मंथन आणि मार्गदर्शन:
कार्यक्रमात साहित्यासोबतच वैचारिक देवाणघेवाणही झाली. विद्यामंदिर कणकवलीचे मुख्याध्यापक श्री पी. जे. कांबळे सर आणि एस.एम. हायस्कूल कणकवलीच्या प्राध्यापिका श्रीम. मनिषा पाटील मॅडम यांनी प्रमुख उपस्थिती दर्शवत मराठी भाषेचे महत्त्व आणि बोली भाषांचे संवर्धन यावर अभ्यासपूर्ण विचार मांडले. गुरुवर्य तानावडे सर आणि ग्रामसेविका यांनीही आपल्या मनोगतातून मराठी भाषेच्या भविष्यातील आव्हानांवर प्रकाश टाकला.

🔸 ​ नेटके नियोजन आणि हृदय संवाद:
संपूर्ण कार्यक्रमाचे ओघवते सूत्रसंचालन सिद्धेश खटावकर यांनी आपल्या खास शैलीत केले. कार्यक्रमाच्या शेवटी निकिता ठाकूर यांनी सर्व मान्यवर आणि रसिक श्रोत्यांचे आभार मानले. औपचारिक कार्यक्रम संपल्यानंतर मान्यवर साहित्यिक आणि उपस्थितांमध्ये एक ‘हृदय संवाद’ रंगला, ज्यामध्ये साहित्याशी संबंधित अनेक आठवणींना उजाळा देण्यात आला.

​गोपुरी आश्रम येथे संपन्न झालेल्या या सोहळ्याचे सर्व स्तरांतून कौतुक होत असून, मराठी भाषेचा वारसा जपण्यासाठी कोमसाप कणकवली शाखेने घेतलेला हा पुढाकार मैलाचा दगड ठरेल, अशा भावना व्यक्त होत आहेत.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *