सिंधुदुर्गनगरी | प्रतिनिधी
जनतेच्या प्रश्नांना दिलासा: पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत अनेक तक्रारींचे त्वरित निवारण
-पालकमंत्री संपर्क कार्यालयात नागरिकांच्या सार्वजनिक आणि वैयक्तिक समस्यांवर थेट सुनावणी
शनिवारी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नागरिकांच्या अनेक सार्वजनिक व वैयक्तिक प्रश्नांना मार्ग मिळाला. जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी सिंधुदुर्गनगरी येथील संपर्क कार्यालयात थेट जनतेशी संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. अनेक रखडलेली प्रकरणे यावेळी निकाली काढण्यात आली, तर काही प्रलंबित विषयांवर संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ सूचना देण्यात आल्या.
सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी आपल्या संपर्क कार्यालयात सायंकाळी तीन ते सात एवढा वेळ जनतेसाठी ठेवला होता. यावेळी जनतेची प्रचंड गर्दी त्यांना भेटण्यासाठी झालेली होती. महावितरण विभागातील कंत्राटी भरती, आरोग्य सेवक, कंत्राटी सफाई कर्मचारी, 108 टोल फ्री रुग्णवाहिका चालक, निवृत्त शिक्षक, कर्मचारी यांचे प्रश्न घेऊन शिष्टमंडळ भेटली. तर काही खाजगी, वैयक्तिक प्रश्न सुद्धा घेऊन नागरिक भेटल्या . पालकमंत्री नितेश राणे काही प्रकरणे जागेवरच मार्गी लागली, तर काहींचे तातडीने निराकरण करण्यासाठी अधिकाऱ्यांना मोबाईलद्वारे निर्देश देण्यात आले.
यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर, तसेच इतर विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. संपर्क कार्यालयात नागरिकांनी मांडलेल्या समस्यांमध्ये मच्छीमार , वीज वितरण अडचणी, एसटी बस वाहतूक सेवा, शिक्षक भरतीचे प्रश्न हे ठळक होते.
