शक्तीपीठ महामार्ग संदर्भात बांदा सरपंच व लोकप्रतिनिधी यांनी रोखली सीमांकन प्रक्रिया
प्रस्तावित पवनार – पत्रादेवी शक्तिपीठ महामार्ग संदर्भात स्थानिकांमध्ये संभ्रमावस्था आहे. पुणे येथील खासगी यंत्रणेमार्फत बांदा परिसरात सुरू असलेली सीमांकन प्रक्रिया आम्ही रोखली. ग्रामपंचायत प्रशासनालाही अंधारात ठेवण्यात आले. बाधित शेतकरी व स्थानिकांना विश्वासात घ्यावे ही आमची भूमिका आहे. यासाठी तातडीने विशेष सभेचे आयोजन करण्यात येईल. जनमताचा कल विचारात घेऊन शक्तिपीठ बाबत भूमिका जाहीर करू, अशी माहिती बांदा सरपंच प्रियांका नाईक यांनी पत्रकार परिषदेत दिली.
प्रस्तावित पवनार – पत्रादेवी (नागपूर – गोवा) शक्तिपीठ महामार्गासाठी सीमांकन प्रक्रिया एका खाजगी कंपनीकडून सुरू आहे. याबाबत स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनाला अंधारात ठेवण्यात आले आहे. बांदा सरपंच व लोकप्रतिनिधी यांनी बुधवारी ही सीमांकन प्रक्रिया रोखली होती.
स्थानिकांमधूनही ग्रामपंचायत प्रशासनाला याबाबत विचारणा होत होती. त्या अनुषंगाने बांदा ग्रामपंचायत प्रशासनाने पत्रकार परिषद घेत आपली भूमिका मांडली.
सरपंच प्रियांका नाईक म्हणाल्या, शक्तीपीठ महामार्ग संदर्भात आमची लढाई प्रशासनाशी आहे. महामार्गासाठी सीमांकन करताना संबंधित ग्रामपंचायत प्रशासनाला विश्वासात घेणे गरजेचे होते. मात्र, तसे झाले नाही. गावातील शेतकरी, व्यापारी, उद्योजक तसेच अन्य ग्रामस्थांकडून याबाबत विचारणा होत आहे. सदर महामार्गासाठी किती जागा संपादित होणार आहे, महामार्गाचा आराखडा याबाबत कोणतीही माहिती अद्याप दिलेली नाही. विशेष सभेत स्थानिक जो निर्णय घेतील, त्यानुसार आमची भूमिका राहील. सभेत महामार्गाला स्थानिकांचा विरोध झाल्यास आम्ही स्थानिकांच्या सोबत राहू, असे स्पष्ट केले.
यावेळी उपसरपंच आबा धारगळकर, ग्रामपंचायत सदस्य बाळू सावंत, जावेद खतीब, प्रशांत बांदेकर, रेश्मा सावंत, देवल येडवे, शिल्पा परब, दीपलक्ष्मी सावंत, रूपाली शिरसाट, रत्नाकर आगलावे, रिया येडवे, साई काणेकर, माजी सरपंच गजानन गायतोंडे आदी उपस्थित होते.