माजी आमदार परशुराम उर्फ जीजी उपरकर वाढदिवस विशेष….

0 minutes, 7 seconds Read

माजी आमदार परशुराम उर्फ जीजी उपरकर वाढदिवस विशेष….

संकटकाळी शड्डू ठोकतो तोच खरा शिवसैनिक…! 

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या तालमीत तयार झालेला दुसरा वाघ पुढे आला. .. आणि शिवसेनेचा तो ढाण्या वाघ म्हणजेच परशुराम उपरकर…!

नाव आणि पक्षचिन्ह चोरून सुद्धा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी स्थापन केलेली शिवसेना आजही त्याच ताकदीने उभी आहे कारण शिवसैनिकांनी आपले रक्त रस्त्यावर सांडून वाढवलेली ही संघटना आहे. शिवसेना या चार अक्षरांसाठी घरादारावर तुळशीपत्र ठेवुन काहीही करण्याची तयारी असलेली शिवसैनिकांची फळी शिवसेनाप्रमुखांच्या तालमीत तयार झाली होती. माजी आमदार परशुराम उर्फ जीजी उपरकर हे त्याच फळीतील एक नाव आहे.

विधानपरिषद निवडणुकीत शेवटच्या क्षणी तिकीट कापल्याने नाराज होऊन परशुराम उपरकरांनी २०१२ साली शिवसेना सोडली. राजकारणात जर-तरला काहीच अर्थ नसतो. तरीसुद्धा काही गोष्टी काळाच्या पटलावर जर-तरच्याच कसोटीवर पडताळून पाहाव्या लागतात. जर त्यांनी शिवसेना सोडली नसती तर दोन वर्षानंतर होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीत विनायक राऊत हे विधानपरिषदेत आमदार असल्याने रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी त्यांनाच मिळाली असती. २०१४ साली मोदी लाटेत शिवसेनेचे जे १८ खासदार निवडून आलेत, त्यात त्यांचा सुद्धा निश्चितपणे समावेश झाला असता. २०१९ साली रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात समोर अपक्ष उमेदवार उभा असल्यामुळे ते पुन्हा एकदा निर्विवादपणे खासदार बनले असते. अशा प्रकारे शिवसेना सोडल्यामुळे त्यांनी दोन टर्म लोकसभेची खासदारकी गमावली. त्यांचे कधीही भरून न येणारे नुकसान झाले. मात्र तब्बल एका तपानंतर त्यांनी आपली राजकीय चुक सुधारली. ज्या पक्षाने आपल्याला राजकीय जन्म दिला, तो पक्ष आज चाहूबाजूनी संकटात सापडलेला असताना परशुराम उपरकर नामक कडवट शिवसैनिक पुन्हा एकदा स्वगृही परतला.

नव्वदच्या दशकात जनता दल आणि काँग्रेसचे प्राबल्य असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिवसेनेचा भगवा झेंडा खांद्यावर घेऊन जीजी उपरकर नावाचा तरुण मुंबईत सर्वदूर पसरलेल्या शिवसेनेची पाळेमुळे सिंधुदुर्गात रुजवू पाहत होता. त्यावेळी संघटनावाढीसाठी ज्या-ज्या वेळी शिवसैनिकांचे विरोधी पक्षासोबत राजकीय राडे झाले, तेव्हा कणकवलीच्या रस्त्यावर अनेकांनी त्यांना रक्तबंबाळ अवस्थेत पाहिले आहे. त्यावेळच्या सत्ताधाऱ्यांनी पोलीसांच्या मदतीने त्यांना मारहाण केली. मात्र दस्तरखुद्द शिवसेनाप्रमुखांकडून बाळकडू प्यायलेल्या या कडवट शिवसैनिकाने हा पोलीसी छळ तितक्याच हिंमतीने सहन केला, रस्त्यावर रक्त सांडले पण खांद्यावरचा भगवा ध्वज कधीही खाली पडू दिला नाही. जशी भगीरथाने अथक प्रयत्न करून गंगा पृथ्वीतलावर आणली होती, तशाच प्रकारचे भगीरथ प्रयत्न करून समाजवाद्यांचा बालेकिल्ला समजला जाणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात त्यांनी शिवसेनेचा भगवा विचार रुजवला. त्याच प्रयत्नांचा एक भाग म्हणून १९८३ साली सिंधुदुर्ग जिल्ह्यात ठिकठिकाणी ‘भगवा सप्ताह’ आयोजित करण्यात आले. १९८८ साली कणकवली ग्रामपंचायतीची पोटनिवडणूक लागली. परशुराम उपरकरांनी ही पोटनिवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. एरव्ही काँग्रेस व जनता दल पक्षाचे जिल्ह्याच्या नव्हे तर संपूर्ण देशाच्या राजकारणात विळी-भोपळ्याचे वैर होते परंतु सिंधुदुर्गात शिवसेनेचा भगवा विचार रुजवू पाहणाऱ्या बाळासाहेब ठाकरेंच्या शिलेदाराला या पोटनिवडणुकीत पराभूत करण्यासाठी काँग्रेस व जनता दल पक्षाने युती केली. या ग्रामपंचायत पोटनिवडणूकीची दखल दस्तरखुद्द शिवसेनाप्रमुखांनी घेतली. ‘साप्ताहिक मार्मिक’मध्ये व्यंगचित्र रेखाटून त्यांनी काँग्रेस व जनता दलाच्या युतीचा ‘अभद्र युती’ म्हणून उल्लेख केला. सरतेशेवटी जीजींनी या पोटनिवडणूकीत दणदणीत विजय मिळवून अभद्र युतीच्या छाताडावर बसून शिवसेनेचा भगवा झेंडा फडकवला. सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुठल्याही निवडणुकीत शिवसेना पक्षाला मिळालेला हा पहिला विजय होता. नव्वदच्या दशकात तळकोकणात शिवसेना रुजवण्यासाठी जिल्ह्याच्या राजकारणात नेहमीच वरचढ राहिलेल्या समाजवाद्यांना आणि कॉंग्रेसच्या पांढरपेशा नेतेमंडळींना हा कडवट शिवसैनिक अक्षरशः पुरून उरला. बघता-बघता तळकोकणात शिवसेना फक्त रुजलीच नाही तर अवघा कोकण प्रांत भगवामय झाला. त्याकाळी सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिवसेना फोफावण्यासाठी रस्त्यावर उतरून संघर्ष करत सर्वात जास्त त्याग कोणी केला असेल, पक्षासाठी विरोधकांचे वार अंगावर झेलून आपले रक्त कोणी सांडले असेल तर ते फक्त परशुराम उपरकरांनीच…!

नारायण राणे यांचे बंड हा शिवसेनेसाठी खरोखरच कसोटीचा काळ होता. त्यांच्यासोबत कोकणातील इतर १५ समर्थक आमदारांनी राजीनामे दिले. ज्या मुंबईत शिवसेनाप्रमुखांचे वर्चस्व होते त्याच मुंबईत ‘दैनिक सामना’च्या कार्यालयासमोरील शिवसेनेच्या सभेचा मंडप जाळून नारायण राणेंनी जशास तसे उत्तर दिले होते. आता अशा आक्रमक नेत्याला तळकोकणात आणि खास करून सिंधुदुर्ग जिल्ह्यात रोखणे म्हणजे साक्षात वाघाच्या गुहेत जाऊन त्याला ललकारण्यासारखेच होते. हे आव्हान स्वीकारण्यासाठी कुणीही धजावत नव्हते. कोकण हा शिवसेनेचा बालेकिल्ला होता आणि या वादळात सर्वात जास्त पडझड बालेकिल्ल्यातच झाली होती. आता पुन्हा एकदा ढासळलेल्या बालेकिल्ल्याची उभारणी करणे एवढा एकच पर्याय पक्षनेतृत्वासमोर शिल्लक होता. पण संघटनावाढीचे हे शिवधनुष्य पेलवणार कोण…? हाच खरा प्रश्न होता.

नारायण राणेंनी आमदारकीचा राजीनामा दिल्यानंतर लगेचच कणकवली-मालवण विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक लागली होती. त्यांच्याविरोधात निवडणूक लढवण्याची कुणाचीही हिंमत होत नव्हती. खरा योद्धा कधीही आपल्या सैन्यासाठी कोणताही त्याग करण्याची तयारी ठेवतो. कुरुक्षेत्रासारखीच काहीशी विचित्र परिस्थिती त्यावेळी सिंधुदुर्ग जिल्ह्यात निर्माण झाली होती. दहशत एवढी फोफावली होती की उमेश कोरगावकर यांच्यावर दिवसाढवळ्या हल्ला करून त्यांना मारहाण करण्यात आली होती. शिवसेनेचा भगवा झेंडा हातात धरण्याची कुणाची हिंमतच होत नव्हती. दहशतीच्या या वातावरणात शिवसेनेतील मुंबईस्थित स्वयंघोषित नेते सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रवेश करताना खारेपाटण बॉर्डरजवळ मधुबन हॉटेलमध्ये थांबून आपल्या गाडीवरचा भगवा झेंडा गुंडाळून गाडीच्या डिक्कीमध्ये ठेवत होते. अशा प्रतिकूल परिस्थितीत शिवसेनेला नारायण राणेंविरोधात कुणी उमेदवार सापडलाच नसता तर पक्षाच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले असते. जेव्हा प्रश्न संघटनेच्या अस्तित्वाचा होता, तेव्हा वाघाच्या गुहेत जाऊन दंड थोपटायला बाळासाहेबांच्याच तालमीत तयार झालेला दुसरा वाघ पुढे आला. आणि शिवसेनेचा तो ढाण्या वाघ म्हणजेच परशुराम उपरकर…!

कणकवली-मालवण विधानसभा पोटनिवडणूकीसाठी परशुराम उपरकरांना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी उमेदवारी जाहीर केली आणि संघटनेच्या अस्तित्वाच्या लढाईसाठी शिवसेनाप्रमुखांसहित संपूर्ण महाराष्ट्रातील शिवसेना सिंधुदुर्ग जिल्ह्यात उतरली. त्यामुळे या परिसराला एखाद्या युद्धभूमीचे स्वरूप प्राप्त झाले होते. महाराष्ट्रात यापूर्वीही अनेक निवडणुका झाल्यात आणि यानंतरही अनेक निवडणुका होतील पण या पोटनिवडणुकीचे वेगळेपण वादातीत राहिल. कणकवली तालुक्यात कनेडी येथे उद्धव ठाकरेंच्या ताफ्यावर दगडफेक झाली आणि या निवडणुकीत पुढे काय वाढून ठेवले आहे याची अनेकांना कल्पना आली. मालवण तालुक्यात मसुरे येथे शिवसैनिकांना सभा घेण्यासाठी जागा मिळू नये म्हणून आटोकाट प्रयत्न करण्यात आले. संपूर्ण पोलीस यंत्रणा व प्रशासन सत्ताधारी पक्षाचे वेठबिगार बनून वागत होते. त्याचा निषेध म्हणून शिवसेना नेते दिवाकर रावतेंनी कणकवली पोलीस स्टेशनला पीआयसमोरील टेबलवर जोरात हात आपटून जाब विचारला, तेव्हा त्यांच्यासमवेत उपस्थित शिवसैनिकांवर गुन्हे दाखल करण्यात आले. मालवण-कसाल रस्त्यावर शिवसेना खासदार तुकाराम रेंगे-पाटीलांना पाठलाग करून मारहाण करण्यात आली. मतदानाच्या दिवशी शिवसेनेच्या संभाव्य मतदारांना टार्गेट करून फिरत होते. त्यामुळे शिवसेनेचा मतदार मतदानादिवशी बाहेरच पडू शकला नाही. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आपल्या राजकीय कारकिर्दीत पहिल्यांदाच मालवणच्या जाहीर सभेत कोकणी जनतेसमोर नतमस्तक झाले. निवडणूक निकालाअंती परशुराम उपरकरांचा पराभव झाला असला तरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिवसेनेचे अस्तित्व त्यांनी विरोधकांना दाखवून दिले. शिवसेना संघटना म्हणून जीवंत राहिली. “सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिवसेना औषधालाही शिल्लक ठेवणार नाही” ही नारायण राणेंची प्रतिज्ञा कधीच पूर्णत्वास गेली नाही कारण ती प्रतिज्ञा आणि शिवसेनेची संघटना यांच्यामध्ये जीजी उपरकर नावाचा लढवय्या शिवसैनिक त्या वादळी कालखंडात मातीत घट्ट पाय रोवून ठामपणे उभा होता.

परशुराम उपरकर यांनी पोटनिवडणूकीदरम्यान दाखवलेल्या लढवय्येपणाचा यथोचित सन्मान म्हणुन शिवसेनाप्रमुखांनी त्यांना विधानपरिषदेत आमदारकीची बक्षीसी दिली. आमदारकीच्या कार्यकाळात त्यांच्यामध्ये इतकी वर्षे दडुन राहिलेल्या अभ्यासु नेत्याची झलक जिल्हावासियांना अनुभवायला मिळाली. रमेश गोवेकर अपहरण, अंकुश राणे हत्या, मालवण सेक्स स्कँण्डल, मडुरा रेव्ह पार्टी असे धगधगते प्रश्न सभागृहात मांडून त्यांनी विधानपरिषद दणाणून सोडली. २०११ साली सिंधुदुर्ग जिल्ह्यात नगरपालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरु असताना वेंगुर्ला शहरात नितेश राणेंनी विलास गावडे यांच्या घरी जात राजकीय दहशत माजवण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी विलास गावडे हे बाहेरगावी गेलेले असल्याने त्यांच्या घरी आई-वडील, बायको आणि लहान मुले होती. वेंगुर्ल्यातील सर्वसामान्य जनतेला हा प्रकार आवडला नाही आणि नितेश राणेंना जाब विचारण्यासाठी सर्वजण काँग्रेस कार्यालयाजवळ एकवटले. जीजींना ही बातमी समजताच ते सुद्धा तातडीने वेंगुर्ल्यात पोहोचले. आज जे स्वतःला हिंदूंचा गब्बर म्हणवून घेतात त्यांना चार तास पक्ष कार्यालयात कोंडून ठेवणारा जीजी उपरकर हा शिवसेनेचा खराखुरा ढाण्या वाघ होता. त्यानंतर संतापलेले नारायण राणे घटनास्थळी कार्यकर्त्यांची कुमक घेऊन पोहोचले आणि जीजींवर जीवघेणा हल्ला झाला. शेवटी जीजींच्या पोलीस बॉडीगार्डने गोळीबार करून त्यांचे प्राण वाचवले. पुढे याच खटल्यात गोट्या सावंत व समीर नलावडे यांना खुनाचा प्रयत्न केल्याच्या प्रकरणात दोषी ठरवून साडे सात वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली. हा शिक्षा विषय अजूनही प्रक्रियेत आहे.अशा प्रकारे शिवसेना संघटनेसाठी आणि सर्वसामान्य जनतेसाठी अनेक वेळा जीवावर उदार होऊन जीजी मैदानात उतरले.

परशुराम उपरकरांचे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, तत्कालीन कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या तिघांशीही अतिशय जिव्हाळयाचे संबंध होते. ही तिघांशीही असलेली जवळीक राजकीयदृष्ट्या फायदेशीर वाटत असली तरी कालांतराने त्यामुळेच त्यांच्यासारख्या कडवट शिवसैनिकाच्या पक्षनिष्ठेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. ज्या भारतीय विद्यार्थी सेनेचे राज ठाकरे अध्यक्ष होते, त्याच संघटनेत जीजी उपाध्यक्ष म्हणून काम पाहत होते. २००८ साली राज ठाकरेंनी शिवसेनेशी फारकत घेऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली. त्यावेळी भगव्याचे पाईक असलेले जीजी शिवसेनेतच राहिले. मात्र शिवसेनेत असताना राज ठाकरेंशी असलेल्या त्यांच्या जवळकीचा आपली राजकीय पोळी भाजण्यासाठी दुरुपयोग करून पक्षनेतृत्वाचे कान भरण्याची रणनीती त्यांच्या काही पक्षांतर्गत शत्रूनी आखली. आमदारकीच्या काळात समितीचे सदस्य म्हणून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जीजींना दौरे करावे लागत होते. अशाच एका दौऱ्यावर असताना त्यांना विमानतळावर समोर राज ठाकरे दिसले. आता पक्ष वेगळे झालेले असले तरी कधी काळी आपण राज ठाकरेंच्या नेतृत्वाखाली काम केले आहे याची मनोमन जाणीव ठेवुन जीजींनी त्यांना वाकून नमस्कार केला. त्यांच्या हितशत्रुनी तातडीने ही गोष्ट मीठमसाला लावून पक्षश्रेष्ठीपर्यंत पोहोचवली. अशा प्रकारे आपल्या राजकीय स्वार्थासाठी एका कडवट शिवसैनिकाच्या निष्ठेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याचा उफरटेपणा करण्यात शिवसेनेचेच काही नेते आघाडीवर होते. परशुराम उपरकर मनसेत प्रवेश करणार आहेत, अशी अफवा पसरवून त्यांनी पक्षश्रेष्ठीच्या मनात त्यांच्याविषयी संशयाचे वातावरण निर्माण केले. त्यावेळी मनसे पक्षाचा मुंबई, ठाणे, नाशिक आणि पुणे या चार शहरांच्या पलीकडे विस्तारच झाला नव्हता. कोकणात या पक्षाची राजकीय प्रगती होण्याची कोणतीही शक्यता नसताना जीजींसारखा नेता त्या पक्षात प्रवेश करण्याची सुतराम शक्यता नव्हती. मात्र गोबेल्स नीतीचा अवलंब करून ही गोष्ट पक्षनेतृत्वाच्या मनावर बिंबवण्यात त्यांचे पक्षांतर्गत शत्रु यशस्वी ठरले. अशा प्रकारे विधानपरिषदेत वादळी कारकीर्द गाजवणारा कडवट शिवसैनिक स्वकीयांच्या कपटकारस्थानांना बळी पडला आणि त्याचीच परिणीती म्हणून परशुराम उपरकरांचे विधानपरिषद निवडणुकीचे तिकीट कापण्यात आले. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून अजित पवारांनी कोकणातील या झुंजार नेत्याला विधानपरिषदेची ऑफर दिली होती. मात्र बाळासाहेब ठाकरे हयात असेपर्यंत आपण शिवसेना सोडणार नाही, असे सांगून त्यांनी ती ऑफर विनम्रतापुर्वक नाकारली. मुळात कितीही मोठे पद मिळाले तरी ठाकरे कुटुंबाव्यतिरिक्त इतर कुणाच्या नेतृत्वात काम करणे त्यांना कदापि शक्य नव्हते. शिवसेनाप्रमुखांच्या निधनानंतर त्यांनी पक्षांतर्गत विरोधाला कंटाळून राज ठाकरेंच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश केला. खरं तर ही एक प्रकारची राजकीय आत्महत्याच होती पण मातोश्रीच्या जवळ असलेल्या एका नेत्याकडून सातत्याने केल्या जात असलेल्या पक्षांतर्गत कोंडीला कंटाळल्यानंतर त्यांच्याकडे पक्षांतर करण्याशिवाय अन्य कोणताही पर्याय शिल्लकच उरला नव्हता. मात्र महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत बारा वर्षे काम करत असताना त्यांनी चुकून सुद्धा ठाकरे कुटुंबावर किंवा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर कधीही टीका केली नाही. सिंधुदुर्गातील शिवसैनिकांना पक्षातील नेत्यांपेक्षा मनसेत काम करणाऱ्या जीजींचाच जास्त आधार वाटायचा. थोडक्यात राजकीय अपरिहार्यतेपोटी पक्ष बदलावा लागला असला तरी त्यांच्यामधील शिवसैनिक तसाच कायम होता. राज ठाकरेंची नारायण राणेंसोबत असलेली मैत्री सर्वश्रुत आहे. त्यांच्या सिंधुदुर्ग दौऱ्यात त्यांनी ओम गणेश बंगल्यावर जावुन अनेकदा नारायण राणेंची भेट घेतली पण त्यावेळी जीजी कधीही राणेंच्या घराची पायरी चढले नाहीत. त्यांनी राजकारणात राहून कधीही आपल्या तत्वांशी तडजोड केली नाही.

जुन २०२२ मध्ये रात्रीच्या अंधारात चाळीस आमदार गुवाहाटीला पळून गेले. त्यांनी शिवसेना पक्ष व धनुष्यबाण चोरला. शिवसेनाप्रमुखांनी मेहनतीने उभारलेल्या संघटनेचे दोन तुकडे झाले. हीच संघटना उभारण्यासाठी जीजींनी त्यांच्या रक्ताचे पाणी केले होते आणि आज तोच पक्ष संकटात असताना त्यांच्यातला शिवसैनिक स्वस्थ बसूच शकत नव्हता. त्यांना पुन्हा एकदा शिवसेनेचा भगवा झेंडा खुणावत होता. त्याच वेळी लोकसभा निवडणुकीत राज ठाकरेंनी मैत्रीखातर नारायण राणेंसाठी जाहीर सभा घेण्याचे मान्य केले आणि परशुराम उपरकरांनी शिवसेनेत पुन्हा प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु असताना शेवटच्या टप्प्यात उद्धव ठाकरेंच्या जाहीर सभेत त्यांचा पक्षप्रवेश निश्चित झाला होता. मात्र त्यांना शिवसेना सोडण्यासाठी प्रवृत्त करणारी नेतेमंडळी पुन्हा एकदा एखाद्या काळ्या मांजराप्रमाणे आडवी आली. जीजींनी दापोलीत युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरेंची सदिच्छा भेट घेतली. त्यावेळी आदित्य ठाकरे त्यांना उद्देशून म्हणाले- “माझ्या लहानपणापासून तुमच्या कुटुंबासोबत आमचे घरगुती संबंध आहेत. आपली दोघांचीही कुटुंबे त्यावेळी गोव्यात एकत्र येऊन धमाल करायची. मधल्या काळात अन्य नेत्यांशी मतभेद झाल्यामुळे तुम्ही आमच्या पक्षापासून काहीसे दुर गेलात पण आपल्यातील कौटुंबिक संबंध आजही तसेच कायम आहेत. जगातली कोणतीही शक्ती तुमचा शिवसेनेतील पक्षप्रवेश रोखू शकत नाही आणि त्यासाठी मी स्वतः पुढाकार घेऊन आई-बाबांशी बोलणार आहे.” परशुराम उपरकरांच्या शिवसेना प्रवेशासाठी स्वतः आदित्य ठाकरेंनीच पुढाकार घेतल्यामुळे त्यांच्या पक्षप्रवेशाला छुपा विरोध करणारे त्यांचे हितशत्रू चांगलेच तोंडावर आपटले. ऑक्टोबर महिन्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत शिवसेनेच्या संघर्षकाळातील योद्ध्याची घरवापसी झाली. पक्षप्रवेश केल्यानंतर लगेचच उद्धव ठाकरेंनी जीजींकडे उकडे तांदूळ मागितले. एकेकाळी शिवसेनेत असताना जीजींकडून ठाकरे परिवाराला न चुकता उकडे तांदूळ दिले जायचे. उद्धव ठाकरेंनी त्याचीच आठवण करून देत आपल्यातील ऋणानुबंध आजही तसेच कायम असल्याचे त्यांना सुचवले. आता शिवसेनेचा दोन दशकांपुर्वी होता तसाच संघर्षमय काळ सुरु आहे आणि या खडतर परिस्थितीत त्यावेळचा संघर्षयोद्धा पुन्हा एकदा शिवसेनेत परतलाय. त्याकाळात परशुराम उपरकरांनी संघटनेची जी पेरणी केली होती, त्यालाच दहा वर्षापूर्वी सत्तारूपी पीक आले होते. सिंधुदुर्गात शिवसेनेचे खासदार आणि दोन आमदार निवडून आले. फक्त ही सत्तेची फळे चाखायला जीजी पक्षात नव्हते. मंदिराच्या पूर्णत्वानंतर तसही शिल्पकाराची गरज भासत नाही. त्यामुळे संघर्षकाळात रस्त्यावर उतरून संघटनेची पेरणी करणारा शिल्पकार सत्ताकाळात मात्र दूरच राहिला. आता पुन्हा एकदा सत्ता गेली आहे आणि आमदार-खासदारांची संख्या शून्यावर आल्यामुळे संघटनेच्या भवितव्याचाच प्रश्न निर्माण झालाय. अशा प्रतिकूल परिस्थितीत कोणत्याही पदाची अपेक्षा न करता परशुराम उपरकर नामक कडवट शिवसैनिक पुन्हा एकदा संघर्ष करण्यासाठी आपल्या मुळ पक्षात परतलाय. ‘शिवसेनेची सत्ता रस्त्यावर असते’ हे शिवसेनाप्रमुखांचे संस्कार त्यांच्या मनावर कायमस्वरूपी कोरले गेले आहेत. किंबहुना संघर्षकाळात अशाच लढवय्या सैनिकांची संघटनेला गरज असते. आज परशुराम उपरकरांना त्यांच्या वाढदिवशी खुप खुप शुभेच्छा देतो आणि भविष्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यात संघर्षातुन शिवसेनेला पुन्हा एकदा ते झळाळी प्राप्त करून देतील, अशी अपेक्षा करतो.

अनुपम कांबळी 

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *