सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात शिवसेना काढणार निष्ठा यात्रा ; आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली कुडाळ तालुक्यातील निष्ठा यात्रेचा १८ जुलै रोजी माणगाव येथे होणार शुभारंभ

0 minutes, 0 seconds Read

पुन्हा एकदा उद्धवजी ठाकरे यांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री करण्याचा निष्ठावंत शिवसैनिकांचा संकल्प

 

आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली कुडाळ तालुक्यातील निष्ठा यात्रेचा १८ जुलै रोजी माणगाव येथे होणार शुभारंभ

 

कणकवली दि‌.(तुळशीदास कुडतरकर)१६ जुलै २०२४

 

उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनी महाराष्ट्र राज्यात चांगला कारभार केला. कोरोना महामारी, पूरस्थिती, चक्रीवादळ अशा अनेक संकाटातुन महाराष्ट्राला वाचविण्याचे काम त्यांनी केले. मात्र शिवसेना पक्षातील काही आमदारांनी गद्दारी करून विश्वासघात केल्याने त्यांना मुख्यमंत्री पदावरून पायउतार व्हावे लागले. मात्र आता पुन्हा एकदा सन्मानाने उद्धव ठाकरे यांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री करण्याचा संकल्प निष्ठावंत शिवसैनिकांनी केला आहे. त्यासाठी शिवसेनेच्या वतीने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील प्रत्येक गावात निष्ठा यात्रा काढण्यात येणार आहे.आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली कुडाळ तालुक्यातील या निष्ठा यात्रेचा शुभारंभ गुरुवार दि. १८ जुलै २०२४ रोजी सकाळी १० वाजता माणगाव येथे होणार आहे. सलग ४५ दिवस ही निष्ठा यात्रा सुरू राहणार आहे. यादरम्यान शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे, शिवसेना नेते विनायक राऊत, शिवसेना नेते भास्कर जाधव, उपनेत्या सुषमा अंधारे, जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर यांसह जिल्ह्यातील शिवसेनेचे नेते, पदाधिकारी यांची निष्ठा यात्रेला उपस्थिती असणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व आठही तालुक्यातील प्रत्येक गावात निष्ठा यात्रा काढून जनतेशी आणि निष्ठावंत शिवसैनिकांशी संवाद साधला जाणार आहे. अशी माहिती शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते यांनी दिली.

उद्धव ठाकरे यांच्यासोबत मोठा विश्वासघात झाला, उद्धव ठाकरे यांना दगा देणारे हिंदू असू शकत नाहीत, उद्धव ठाकरे पुन्हा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान होवोत, अशा भावना ज्योतिर्मठाचे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांनी कालच व्यक्त केल्या आहेत.उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री असण्याचे महत्व या निष्ठा यात्रे दरम्यान जनतेला समजावून सांगितले जाणार आहे. शिवसेनेच्या अनेक आमदार, खासदारांनी पक्षाशी गद्दारी केली. मात्र जिल्ह्यातील शिवसेनेचे आमदार वैभव नाईक हे उद्धवजींसोबत,पक्षासोबत आणि जनतेसोबत निष्ठावंत राहिले. त्यांच्याबरोबर पदाधिकारी शिवसैनिकांनीही पक्षाशी निष्ठा दाखवली. या सर्वांचा सन्मान निष्ठा यात्रा करणार आहे. तरी माणगाव येथून सुरु होणाऱ्या या निष्ठा यात्रेला कुडाळ तालुक्यातील सर्व शिवसैनिक व जनतेने मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते यांनी केले आहे.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *