कणकवली (प्रतिनिधी)
हळवल फाट्यावरील अपघात रोखण्यासाठी तत्काळ उपाययोजना करा – अबिद नाईक
महामार्ग प्राधिकरणच्या कार्यालयाला टाळे ठोकण्याचा दिला इशारा
मुंबई गोवा महामार्गावरील हळवल फाटा येथे सातत्याने अपघात होत आहेत. गेल्या तीन वर्षात येथे आठ ते दहा जणांचे बळी गेले आहेत. हे अपघात रोखण्यासाठी गतिरोधक किंवा इतर उपाययोजना एक महिन्याच्या आत कराव्यात, अन्यथा महामार्ग प्राधिकरण कार्यालयाला टाळे ठोकणार असल्याचा इशारा राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांनी शुक्रवारी दिला.
श्री. नाईक यांच्यासह, राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस सावळाराम अणावकर, तालुकाध्यक्ष राजू पावसकर, प्रांतिक सदस्य विलास गावकर, युवक तालुकाध्यक्ष निशिकांत कडुलकर आदींनी शुक्रवारी प्रांताधिकारी जगदीश कातकर यांची भेट घेतली. यावेळी त्यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनात म्हटले आहे की, हळवल फाटा येथे मोठे कंटेनर पलटी होतांना अनेक माणसे केवळ सुदैवाने बचावलेली आहेत. २ फेब्रुवारीच्या पहाटे याच वळणावर एक काचा भरलेला कंटेनर पलटी होवून त्यातील दोन्ही व्यक्ती केवळ सुदैवाने वाचल्या आहेत. तसेच अपघात रात्रीच्या वेळी झाल्याने माणसांची वर्दळ नव्हती म्हणून मनुष्यहानी टळली आहे.
गेली ४ वर्षे आमच्या राष्ट्रवादी काँग्रेसपक्षा मार्फत अनेक वेळा ह्या ठिकाणी डांबराचे छोटे गतिरोधक घालणे, मोठ्या अक्षरात वळणदर्शक फलक लावणे, हायमॅक्स बसविणे ह्या मागण्या केलेल्या आहेत. मात्र महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी कोणतीही कार्यवाही करत नाहीत.
