कणकवली (प्रतिनिधी)
ओसरगाव येथिल माकड आणि गव्यांचा वनविभागाने तातडीने बंदोबस्त करा!
ग्रामस्थांची वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे मागणी!
गेली अनेक वर्षे कणकवली तालुक्यांतील ओसरगाव गावात माकड आणि गवारेडे यांच्यापासून गावातील शेतकऱ्यांना प्रचंड प्रमाणात नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
नारळ, सुपारी, फणस, केळी, काकडी, आंबा, काजू , तसेच बागायतीच, भाजी पाला व अन्य फळझाडे असणाऱ्या शेतकऱ्यांचे या माकडांनी खुप नुकसान केले आहे. उन्हाळी आणि पावसाळी शेती करणे ही या माकड आणि गवारेडयामुळे त्रासदायक होत आहे.
त्यामुळे गावातील उन्हाळी शेती भुईमुग, कुळीथ, मुग, नाचणी, भाजीपाला, करणाऱ्या शेतकऱ्यांनी नाईलाजास्तव शेती करणे बंद केले आहे.
तरी शेतकऱ्यांना होणाऱ्या त्रास लक्षात घेवून वनविभागाने ओसरगावमध्ये माकड पकड (रेसक्युटीम) मोहीम लवकरात लवकर राबविण्यात यावी. आणि गवारेड्याचाही बंदोबस्त करावा अशी मागणी ओसरगाव ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली आहे.
अन्यथा ग्रामस्थ सनदशील मार्गाने आंदोलन करतील असे निवेदन कणकवली वनविभागाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आले आहे.
यावेळी ओसरगाव सरपंच सौ. सुप्रिया कदम, तंटामुक्ती अध्यक्ष प्रदिप तळेकर, सामजिक कार्यकर्ते संतोष कदम , विजय सावंत,सह ग्रामस्थ आणि शेतकरी उपस्थित होते.
