बांदा (मंगल कामत) १७ ऑगस्ट २०२४
युवा पिढीने समर्पित भावनेने देशसेवेला वाहून घ्यावे — प्राचार्य डाॅ- गोविंद काजरेकर
” जनतेच्या हृदयात देशभक्तीची भावना चिरंतन राहावी आणि भारताच्या राष्ट्रध्वजाबद्दल जागरूकता वाढावी या भावनेने हर घर तिरंगा ही मोहिम संपूर्ण भारताभर राबवली जात आहे. युवा पिढीमध्ये देशाभिमान आणखीन वाढीला लावावा , विविध उपक्रमांच्या माध्यमातून या युवा पिढीला सहभागी करून घेत आणि त्यांच्या कर्तृत्वाला वाव दिला तर सक्षम राष्ट्र उभारणीत युवकांचा सहभाग वाढेल ” असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. गोविंद काजरेकर यांनी येथे केले .
“हर घर तिरंगा” या शासनाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या अभियानांतर्गत येथील गोगटे– वाळके महाविद्यालयातील एन.सी.सी. आणि एन.एस.एस. विभागाच्यावतीने ” हर घर तिरंगा” हे अभियान राबविण्यात आले होते. या प्रसंगी विद्यार्थ्यांना संबोधित करताना प्राचार्य डाॅ. काजरेकर हे बोलत होते.
देशभक्तीपर गीते , देशभक्तीपर विविध घोषणा , देशाभिमान जागृत करणारे फलक, राष्ट्रीय ध्वज, यांचा सहभाग असलेली राष्ट्रभावना जागृत करणारी प्रभात फेरी महाविद्यालयातून काढण्यात आली. एन. एस.एस.विभाग आणि एन.सी.सी .विभागाच्या शिस्तबद्ध संचलनाने ही प्रभात फेरी नुकतीच कॉलेज परिसरातून बांद्यात काढण्यात आली .
या फेरीचे नियोजन राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या विभाग प्रमुख प्रा.रश्मी काजरेकर, क्रीडा विभाग प्रमुख डॉ. एस. बी. शिरोडकर डॉ के .के. म्हेत्री एन.सी.सी .विभाग प्रमुख प्रा. प्रसाद जाधव , प्रा. सुधीर न्हावेलकर, प्रा. डॉ. अनिल शिर्के आदि जणांच्या मार्गदर्शनाखाली या अभियानांचे नियोजन करण्यात आले.
