राणेंनी उद्योग खात्यात ३ हजार कोटींचा भ्रष्टाचार केला ,त्यामुळेच राणेंना पुन्हा मंत्रिमंडळात स्थान नाही – विनायक राऊत 

 

कणकवली दि ‌१३ नोव्हेंबर (प्रतिनिधी)

राणेंनी उद्योग खात्यात ३ हजार कोटींचा भ्रष्टाचार केला ,त्यामुळेच राणेंना पुन्हा मंत्रिमंडळात स्थान नाही – विनायक राऊत 

नारायण राणे यांच्याकडे मोदींनी सुक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग मंत्रालयाची जबाबदारी दिली होती. या मंत्रिपदाच्या काळात राणे एकही उद्योग सिंधुदुर्गात आणू शकलेले नाहीत. उलट मंत्रीपदाचा गैरवापर करून त्यांनी या खात्याच्या माध्यमातून तब्बल ३ हजार कोटींचा घोटाळा केला असा आरोप माजी खासदार आणि शिवसेना सचिव विनायक राऊत यांनी केला.

 

कणकवली येथील महाविकास आघाडीचे उमेदवार संदेश पारकर यांच्या प्रचार सभेत श्री. राऊत बोलत होते. यावेळी महाविकास आघाडीचे उमेदवार संदेश पारकर यांच्या प्रचारार्थ श्री. ठाकरे यांनी आज कणकवलीत जाहीर प्रचारसभा घेतली. यावेळी विधानसभप्रमुख सतीश सावंत, युवासेना प्रमुख सुशांत नाईक, माजी आमदार परशूराम उपरकर, शरद कोळी, जिल्हा महिला संघटक निलम पालव, राष्ट्रवादीचे अनंत पिळणकर, काँग्रेस जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख, भाजप नेते गौरी शंकर खोत, अतुल रावराणे, उमेदवार संदेश पारकर , तालुकाप्रमुख प्रथमेश सावंत ,यांच्यासह महाविकास आघाडीचे नेते उपस्थित होते.

राऊत पुढे बोलताना म्हणाले की, राणे यांनी आपल्या उद्योग मंत्रालयामार्फत उद्योग आणण्याऐवजी उद्योग विकण्याचे काम केले. पाचशे आठशे कोटी पर्यंत होणाऱ्या प्रकल्पांमध्ये त्यांनी आपल्या सचिवांच्या माध्यमातून प्रत्येकी दहा टक्के रक्कम घेतली. यात कमिशन घेऊन देखील त्यांनी ते उद्योग तिसऱ्यांनाच विकण्याचाही उद्योग केला. या भ्रष्टाचाराची तक्रार अखेर अनेक उद्योजकांनी खुद्द नरेंद्र मोदी यांच्याकडे केली. त्यामुळे खासदार होऊन देखील नारायण राणे यांना मोदींनी आपल्या मंत्रिमंडळामध्ये स्थान दिलेले नाही.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *