५ ऑक्टोबर रोजी कणकवलीत निघणार भव्य “आरक्षण बचाव रॅली”- आमदार नितेश राणे 

 

कणकवली दि २६ सप्टेंबर (तुळशीदास कुडतरकर)

 

५ ऑक्टोबर रोजी कणकवलीत निघणार भव्य “आरक्षण बचाव रॅली”- आमदार नितेश राणे 

 

आरक्षण संपविणार हे राहूल गांधींचे वक्तव्य संविधानाने एससी, एसटी, एनटी अशा समाजातील दुर्बल घटकांना दिलेले अधिकार हिरावून घेणारे 

 

राहुल गांधी वक्तव्याने काँग्रेसचा खरा चेहरा जनतेसमोर आला

 

आरक्षण आमच्या हक्काचे, ते संपू देणार नाही ;आमदार नितेश राणे यांनी सुनावले

 

रॅली जाणवली नदी येथून बुद्ध विहार,मार्गे छ. शिवाजी महाराज चौकात येणार

 

काँग्रेस पक्षाची भारत देशात सत्ता आली तर काँग्रेस आरक्षण व्यवस्थाच संपवून टाकणार असे वक्तव्य विरोधी पक्षनेता व काँग्रेसचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष राहूल गांधी यांनी केले आहे. डॉ. बाबसाहेब आंबेडकर यांनी संविधानाच्या माध्यमातून आरक्षणाचा जो हक्क दिलेला आहे, तो संपवून टाकण्याचा निर्धारच राहुल गांधी यांनी केलेला दिसतो. आरक्षण हा आमचा हक्क असून आम्ही आरक्षण घालवू देणार नाही. म्हणूनच महायुतीच्या माध्यमातून आम्ही ५ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वा. कणकवली येथे विधानसभा क्षेत्रासाठीची भव्य आरक्षण बचाव रॅली काढणार असल्याची माहिती भाजप प्रवक्ते ,आमदार नितेश राणे यांनी दिली.

येथील प्रहार भवनमध्ये पत्रकार परिषदेत बोलताना आमदार नितेश राणे म्हणाले, राहूल गांधींचे वक्तव्य हे संविधानाने एससी, एसटी, एनटी वा इतर समाजाला जो आरक्षणाचा हक्क दिलेला आहे, तो संपुष्टात आणण्याचा निर्धार केलेला दिसतो. त्यामुळे आमचा हा समाज जो वर्षानुवर्षे हक्काने समाजात वावरतो, शिक्षण, नोकरी व इतर स्तरावर जो अधिकार त्यांना आहे, तो काढून घेण्याचे व आरक्षण संपविण्याचे काम राहूल गांधी व काँग्रेसकडून होईल असे दिसून येते. आम्ही याला विरोध करणार असून काही झाले तरी भारत देशातील आरक्षण घालवू देणार नाही, असे भाजप आमदार नितेश राणे यांनी सांगितले.

याचसाठी कणकवली विधानसभेसाठीची आरक्षण बचाव रॅली महायुतीच्या घटक पक्षांसोबत काढण्यात येणार आहे. ५ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वा. जानवली पुलाकडून ही रॅली सुरू होणार आहे. सदरची रॅली कणकवली शहरातील बुद्ध विहार येतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथे येऊन डॉ. बाबासाहेबांना अभिवादन करणार. त्यानंतर पुढे छत्रपती शिवाजी महाराज चौकात येणार असून तेथे सभा होणार तसेच आमच्या शिष्टमंडळाच्यावतीने प्रांताधिकाऱ्यांना निवेदनही देण्यात येणार आहे. आम्ही राहूल गांधी यांचे वक्तव्य, भूमिका स्विकारत नाही. आमच्या हक्काचे आरक्षण हिसकावू देणार नाही. हा थेट संदेश या आरक्षण बचाव रॅलीच्या माध्यमातून देण्यात येणार आहे, असेही श्री. राणे म्हणाले.

१९३८ मध्ये डॉ. बाबसाहेब आंबेडकर हे कणकवलीत आलेले होते. जानवली येथील नदीकिनारी त्यांची परिषद झाली होती. यावेळी काँग्रेसचा पराभव करून डॉ. बाबसाहेबांचा उमेदवार शामराव परुळेकर हे निवडून आलेले होते. या इतिहासाची नोंद असून म्हणुनच आम्ही या रॅलीची सुरूवातही जानवली येथून करणार असल्याचे श्री. राणे यांनी सांगितले.

राहूल गांधीची प्रवृत्ती, विचार जो आहे, त्यामुळे आमच्या हक्काचे आरक्षण जाईल. त्यामुळे या विचाराला विरोध व ज्यांना हक्काचे आरक्षण जाऊ नये, असे वाटत आहे, अशा सर्वांनी यात आरक्षण बचाव रॅलीत सहभागी व्हावे. आरक्षण हा आपला प्रत्येकाच अधिकार असून तो हिसकावून घेण्याचा कुणी प्रयत्न करत असेल तर त्याला कडाकडून विरोध करावयाचा आहे. लोकसभेच्या निवडूकीवेळी चूकीच्या पद्धतीने प्रचार करून पंतप्रधान संविधान विरोधी म्हणून काहींनी प्रचार केला. पंतप्रधानांनी तसे कोणतेही वक्तव्य केलेले नसतानाही जे कुणी बोललेही नाही वा कुणाच्या मनातही नाही, ते खोटे पसरविण्याचे काम करण्यात आले होते. समाजात भिती निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेला होता. आता तर आरक्षण संपविण्याची भाषा राहूल गांधी यांनी स्वतःच केली असून यापेक्षा मोठा पुरावा काय असू शकणार? म्हणूनच याला विरोध करण्यासाठी सर्वांनी एकत्रित येत या आरक्षण बचाव रॅलीत सहभागी होण्याचे आवाहन श्री. राणे यांनी केले. यावेळी आरपीआय आठवले गटाचे अजितकुमार कदम, भाजपा मागासवर्गीय सेलचे जिल्हाध्यक्ष नामदेव जाधव, किरण जाधव, भाजपा तालुकाध्यक्ष मिलींद मेस्त्री आदी उपस्थित होते.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *