कणकवली (प्रतिनिधी)
सुशांत दळवी यांच्या खूनप्रकरणी पोलिसांची भूमिका संशयास्पद असून सुशांत दळवी यांच्या खुनात सहभागी असणाऱ्यां सर्वांचा शोध घेत त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. सुशांत दळवी यांना एका सत्ताधारी पक्षाच्या नेत्याकडून काही दिवसांपूर्वी धमकी आली होती. त्याची तक्रारही त्यांनी केली आहे. असा गौप्यस्फोट माजी आमदार वैभव नाईक यांनी केला.
त्यामुळे पोलीस सत्ताधाऱ्यांच्या दबावाखाली काम करत आहेत का? असा सवाल उपस्थित केला. तर पोलिसांनी खून प्रकरणाच्या केलेल्या तपासाबाबत जनतेतून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे असा आरोप माजी आमदार परशुराम उपरकर यांनी केला.
कणकवली पोलिसांनी जो आरोपी या प्रकरणात अटकेत घेतला आहे हा आरोपी प्रमुख आरोपी नसावा किंवा यामागील खरा सूत्रधार वेगळाच असावा अशी देखील जनतेमध्ये चर्चा आहे. त्यामुळे याप्रकरणी सखोल तपास करण्याची गरज आहे. तसेच याबाबत एका सरकारी वकिलाने देखील आरोपी बाबतची माहिती माध्यमांना दिल्याने एकूणच या प्रकरणातील संशय अजून वाढत असल्याचे वैभव नाईक व परशुराम उपरकर यांनी सांगितले.
सुशांत दळवी हा निष्ठावंत शिवसैनिक होता त्याला न्याय मिळवून दिल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही असा देखील इशारा त्यांनी दिला. कणकवली विजय भवन मध्ये पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी नगरसेवक संकेत नाईक, सचिन सावंत, राजू राठोड,रुपेश आमडोस्कर, श्री. सावंत, नंदू परब,लक्ष्मण दळवी आदी उपस्थित होते.
