कणकवली दि १३ नोव्हेंबर (प्रतिनिधी)
संपूर्ण महाराष्ट्रात निश्चितपणे महाविकास आघाडीचे सरकार येईल आणि इथल्या भूकंपामुळे दिल्लीच्या तख्ताला तडे जातील – उध्दव ठाकरे
सिंधुदुर्गातील बापलेक हे महाराष्ट्रद्रोही आहेत. भाजपची पर्यायाने गुजरातची चाकरी करून ते इथले उद्योग गुजरातला नेण्यासाठी हातभार लावत आहेत. अशा महाराष्ट्रद्रोहींना सिंधुदुर्गातील जनतेने थारा देऊ नये असे आवाहन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज केले. तर छत्रपतींचा पुतळा पडल्यानंतर चांगलं काही तरी होईल असं म्हणणाऱ्या दीपक केसरकरांना जोड्यानं मारायचं नाही तर काय करायचं असा सवाल श्री. ठाकरे यांनी केला.
महाविकास आघाडीचे उमेदवार संदेश पारकर यांच्या प्रचारार्थ श्री. ठाकरे यांनी आज कणकवलीत जाहीर प्रचारसभा घेतली. यावेळी माजी खासदार विनायक राऊत, विधानसभप्रमुख सतीश सावंत, युवासेना प्रमुख सुशांत नाईक, माजी आमदार परशूराम उपरकर, शरद कोळी, जिल्हा महिला संघटक निलम पालव, राष्ट्रवादीचे अनंत पिळणकर, काँग्रेस जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख, भाजप नेते गौरी शंकर खोत, अतुल रावराणे, उमेदवार संदेश पारकर , तालुकाप्रमुख प्रथमेश सावंत ,यांच्यासह महाविकास आघाडीचे नेते उपस्थित होते.
श्री. ठाकरे म्हणाले, शिवसेना संपविण्याचा नादात आता भारतीय जनता पक्षच देखील संपत चालला आहे. पूर्वी माधव भांडारी आमच्यावर टीका करायचे. आम्ही देखील ती टीका स्वीकारायचो. पण आता भाजपमध्ये सगळेच उपरे आले आहेत आणि ते आमच्यावर टीका करत आहेत. भाजप गेली दहा वर्षे सत्तेत आहे. पण त्यांना अजूनही मुंबई गोवा महामार्ग पूर्ण करता आलेला नाही.
